Umesh Kamat-Priya Bapat यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग!

R D Burman यांच्याकडील म. रफी यांचे शेवटचे गाणे!
“यार पंचम, तू मुझसे ये हाय पिच वाला गाना क्यों का गाना चाहता है?” हा प्रश्न विचारला होता मोहम्मद रफी यांनी आर डी बर्मन यांना. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ या चित्रपटातील एका गाण्याच्या रिहर्सल साठी रफी पंचमच्या घरी गेले होते. तेव्हा रफी यांची प्रकृती फारशी बरी नव्हती. आर डी यांनी स्वतःच्या आवाजात डब केलेले गाणे रफी यांना ऐकवलं होतं. गाणे ऐकल्यानंतर रफी यांनी पंचमला हा प्रश्न विचारला आणि तो बरोबर देखील होता. “किशोर कुमार उपलब्ध असताना हे हाय पीचचे प्ले फुल गाणे त्यांच्याकडून गाऊन न घेता माझ्याकडून का गाऊन घेत आहात?”, असा त्यांचा प्रश्न होता.
खरंतर पंचमने या गाण्यासाठी आधी किशोर कुमार यांनाच गाठले होते परंतु किशोर कुमार यांनी हे गाणे जास्त हाय पिच चे आहे त्यामुळे गायला नकार दिला. त्या मुळे आता पंचम यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता ते रफी यांच्याकडे गेले. पण त्यांना किशोरने हाय पीच म्हणून गाण्यांना नकार दिला आहे कसे सांगणार म्हणून ते म्हणाले, “रफी साहेब हे गाणं तुमच्याकडे मुद्दाम मी घेऊन आलो आहे कारण या गाण्यातील सह गायक मी आहे! आणि हे गाणे गाताना तुम्ही मला सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे!” पंचम यांची ही लोणकढी थाप रफी यांना पटली!
त्यानंतर काही दिवसांनी रफी या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये आले. खरं तर रफी यांना जास्त त्रास द्यायची पंचमीची इच्छा नव्हती. त्यामुळे रिहर्सल न करताच त्यांनी या गाण्याची रेकॉर्डिंग करायचे ठरवले. रफी आणि पंचम या दोघांनी गायलेलं ते गाणं होतं ‘यम्मा यम्मा ये खूबसूरत समा..’ गाणं मस्त रेकॉर्ड झालं। रफी देखील खूष झाले. कोणतीही रिहर्सल न करता आपण हायपीच चं गाणं गाऊ शकलो याचा त्यांना आनंद वाटला. रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्या रात्री पंचम यांनी ते गाणे ऐकले. तेव्हा त्यांना आपला स्वतःचा आवाज थोडा दबल्या सारखा वाटला म्हणून त्यांना हे गाणे पुन्हा रेकॉर्ड करावे असे वाटले. दुसऱ्या दिवशी त्यांनी रफी यांना फोन करून अडचण सांगितली. रफी म्हणाले,” काही हरकत नाही पुढच्या आठवड्यात आपण हे गाणे पुन्हा रेकॉर्ड करू“..
पण हा पुढचा आठवडा कधी आलाच नाही कारण त्याच आठवड्यात 31 जुलै 1980 या दिवशी रफी यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पंचमने हे रेकॉर्ड केलेले गाणे जशाच्या तसे ‘शान’ या चित्रपटासाठी दिले. आज आपण हे गाणे जेव्हा ऐकतो तेंव्हा त्यात कुठलीच त्रुटी आपल्याला वाटत नाही. रफी यांनी आर डी कडे गायलेले हे शेवटचं गाणं ठरलं. ‘शान ‘ या चित्रपटात रफी यांनी आणखी दोन गाणी गायली होती. एक गाणं मझहर खान वर चित्रित झालं होतं. आते जाते हुये मै सब पे नजर रखता हूं..’ आणि दुसरे गाणे ‘जानू मेरी जान मै तेरे कुर्बान..’ हे उषा मंगेशकर/किशोर कुमार सोबत गायले होते.
रफी यानी आर डी बर्मन यांच्याकडे 73 सिनेमातून 122 गाणी गायली. त्यांच्यातील हे शेवटचं गाणं खूप युनिक ठरलं! मोहम्मद रफी यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 21 वेळा फिल्मफेअर चे सर्वोत्कृष्ट गायकाचे नामांकन मिळाले त्यापैकी सहा वेळा ते विजेते ठरले . रफी यांना राष्ट्रीय पारितोषिक 1978 साली ‘हम किसीसे कम नही’ या चित्रपटातील ‘क्या हुआ तेरा वादा’ या गाण्यासाठी मिळाले. याच गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचे देखील अवॉर्ड मिळाले होते. रफी यांना राष्ट्रीय पारितोषिक ज्या गाण्या करिता मिळाले त्या गाण्याचे संगीतकार आर डी बर्मन होते! आर डी बर्मन यांनी स्वरबद्ध केलेल्या पहिल्या चित्रपटात छोटे नवाब (1961) मध्ये रफी यांनी चार गाणी गायली होती. तेव्हापासूनच या दोघांचे सूर जुळले होते सत्तरच्या दशकात किशोरचा स्वर जरी आर डी च्या संगीतात जास्त दिसत असला तरी ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला आर डी बर्मन यांनी रफीच्या स्वराचा यथायोग्य असा वापर करून घेतला!