ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे

Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!
इसाक मुजावर नेहमी म्हणायचे तीन श्यामने सुलोचना चव्हाण यांच्या आयुष्यात बहार आणली!पहिले श्याम म्हणजे संगीतकार श्यामबाबू पाठक ज्यांनी सुलोचना कदम यांना पहिल्यांदा हिंदी सिनेमामध्ये गायला संधी दिली.दुसरे शाम म्हणजे संगीतकार श्यामसुंदर.ज्यांच्या ‘ढोलक’(१९५१) या चित्रपटाने सुलोचना कदम यांचा आवाज हिंदी सिनेमांमध्ये देशभर गाजला आणि तिसरे श्याम म्हणजे शामराव चव्हाण ज्यांच्याशी सुलोचना कदम यांनी लग्न केले आणि त्या सुलोचना कदमच्या सुलोचना चव्हाण बनल्या! त्यांच्या लावण्या आपल्याला माहिती आहेतच पण त्यापूर्वी हिंदी सिनेमा संगीतात त्यांच्या स्वराने धूम मचवली होती.हिंदी सिनेमातील सुलोचना बाईंच्या कालखंडाचा हा आढावा.हा विस्मृतीत गेलेला त्यांचा भूतकाळ आज आठवलाच पाहिजे. (Sulochana Chavan)

आजच्या पिढीला डोक्यावर पदर घेऊन,कपाळावर मोठ्ठं कुंकू आणि लावून खणखणीत आवाजात लावणी गाणाऱ्या खानदानी रूपातील सुलोचना चव्हाण माहिती आहेत. कारण त्यांचं हेच रूप आपण सातत्याने कित्येक वर्ष पाहत आहोत.साठच्या दशकाच्या मध्यापासून लावणी या गीत प्रकारातील सम्राज्ञी पद त्यांनी मिळवलं.लावणी सम्राज्ञी हा सन्मान त्यांना आचार्य अत्रे यांनी दिला. त्यानंतर लावणी म्हणजे सुलोचना चव्हाण हे समीकरणच बनले. गंमत म्हणजे साठच्या दशकाच्या उत्तरार्धानंतर त्यांनी चित्रपटातून गाणं तसं कमी केलं होतं पण त्यांच्या गाण्यांचे खाजगी शोज मोठ्या संख्येने देशभर होत होते. आणि त्यातून प्रामुख्याने मागणी होत होती त्यांच्या लावण्यांना! त्यांच्या लावण्यांनी अफाट लोकप्रिय हासील केली होती.शृंगारिक लावण्या देखील खानदानी पद्धतीने गाता येतात हे त्यांनी दाखवून दिलं होतं. चेहऱ्यावर कुठलेही अनावश्यक हावभाव न आणता अतिशय ठसक्यात सुलोचनाबाई लावण्या गात असायच्या! (Marathi entertainment news)

पण बऱ्याच रसिकांना कदाचित ठाऊक नसेल की सुलोचना चव्हाण यापूर्वी हिंदी सिनेमातील एक आघाडीच्या गायिका होत्या. त्या वेळी सुलोचना कदम होत्या.चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि पन्नास च्या दशकात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून आपला स्वर दिला होता. सुलोचना कदम- चव्हाण यांचा जन्म मुंबईतला १३ मार्च १९३३ साली मुंबईत झाला. शाळेत जायची त्यांना अजिबात आवड नव्हती. घरात ग्रामोफोन होताच. त्यावरच्या त्या तबकड्या मधून सुरीले येणारे स्वर कानात साठवून ठेवले. कुणाकडेही संगीताचे विधिवत संगीत शिक्षण न घेतलेल्या सुलोचना कदम यांनी स्वकर्तृत्वावर यशाचे मोठे शिखर गाठले होते. शाळेत असताना त्यांना अभ्यासाचा प्रचंड कंटाळा असायचा.त्यांना शाळेत जावेसेच वाटत नसायचे. (शाळेच्या बिल्डिंग वर मोठा बॉम्ब पडून शाळा कोसळून जावी असा दुष्ट विचार त्यांच्या बालमनात नेहमी येत असायचा!) चार यत्ता शिकल्यानंतर त्यांनी शाळेला रामराम ठोकला. (Entertainment news)
या काळात मुंबईमध्ये गणेशोत्सवात अनेक मेळे होत असत. या मेळ्यातून त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली अनेक नाटकातून देखील त्यांनी या काळात कामे केली. त्यावेळी त्यांच्यासोबत वत्सला देशमुख आणि विजया देशमुख या मैत्रिणी देखील होत्या. पुढे या दोघीही सिनेमात गेल्या. यातील विजया देशमुख म्हणजे ‘नवरंग’,’दो आंखे बारा हाथ’,
‘पिंजरा’ या चित्रपटाची नायिका संध्या! १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले.सांस्कृतिक जीवनामध्ये देखील एक नवी वेगळी पहाट उगवत होती. अनेक मुस्लिम कलावंत आपला देश सोडून पाकिस्तान मध्ये जात होते. त्यावेळी इथे अनेक कलाकार चित्रपटसृष्टीत नव्याने येऊ पाहत होते. यात मंगेशकर भगिनी तर होत्याच पण याच वर्षी सुलोचना कदम यांनी देखील आपले पहिले हिंदी चित्रपट गीत गाणी गायले. चित्रपट होता ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटाचे संगीतकार होते श्याम बाबू पाठक. (Untold stories)

या चित्रपटात ‘मै तो सो रही थी बन्सी काहे को बजाई’ हे पहिले गीत सुलोचना बाईंच्या आवाजात रेकॉर्ड झाले. याच चित्रपटातील ‘हाय नशे मे चूर प्याली हात मे’ हे गीत देखील त्यांनी गायले होते.एकाच चित्रपटात दोन विभिन्न भावना दर्शवणारे गीत गावून त्यांनी संगीतकारांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच याच वर्षी ‘किस्मतवाली’ या चित्रपटात देखील त्यांना गायची संधी मिळाली आणि त्यांच्यासाठी हिंदी सिनेमाची दारे सताड खुली झाली. (Bollywood update)
या काळात त्यांनी अजित मर्चंट, सी रामचंद्र, रशीद अत्रे, ज्ञानदत्त, मुस्ताक हुसेन, प्रेमनाथ, एस के पाल, अविनाश व्यास, के नारायणराव यांच्या संगीतामध्ये जंगल मे मंगल, पारो, चंदा की चांदनी, दुखी यारी, लाल दुपट्टा, रिफ्यूजी, बचके रहना, बाबूजी, बसेरा, भीष्म प्रतिज्ञा, दुश्मनी, हसते रहना, हर हर महादेव या चित्रपटातील गाणी गायली. या चित्रपटातील सर्व गाणी आज विस्मृतीत गेलेले असले तरी दोन गाण्यांसाठी मात्र आपल्याला सुलोचना कदम यांना आठवावेच लागेल. हा चित्रपट १९५१ साली आला होता. चित्रपट नाव होते ‘ढोलक’ यात मीना शोरी ही नायिका होती. यातील ‘चोरी चोरी आग सी दिल मे लगा कर चल दिये’ आणि ‘मौसम आया है रंगीन’ही दोन गाणी एकेकाळी रेडिओ सिलोन वर प्रचंड गाजत होती. (Bollywood tadaka)
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
जुन्या रसिकांना आठवत असेल रेडिओ सिलोन वर पूर्वी हमेशा जमा गीत नावाचा कार्यक्रम असायचा त्यामध्ये या दोन गाण्यांना रसिकांची मोठी पसंती असायची. दिल ही दिल मे रहेंगे हम (काले बादल) उडी हुई है इश्क की दुनिया (रेफ्युजी) घीर के बादल आये (अलख निरंजन) भोली सी नजर (रूप लेखा) लौट आये पिया (बसेरा) रूत बरखा की आई (आग का दरिया) पन्नासच्या दशकाच्या आरंभी सुलोचना कदम यांनी ऑल इंडिया रेडिओवर देखील गायला सुरुवात केली.त्या निमित्ताने जालंधर, इंदोर , जयपुर,या स्टेशनवर त्या गायला लागल्या. हिंदी आणि गुजराती नाटकातून त्यांनी भूमिका देखील केल्या. त्यांच्या गाण्यांचे अनेक प्रायव्हेट अल्बम्स त्या काळात प्रसिद्ध झाले होते.
============
हे देखील वाचा : Kishore Kumar : किशोर कुमार ‘हे’ गाणं गातांना का नर्व्हस होते !
============
सुलोचना कदम एकदा जयपुर येथे एका कार्यक्रमाला गेल्या होत्या तिथे त्यांनी एक गीत, एक भजन आणि गझल गायली. कार्यक्रम झाल्यानंतर ज्या वेळेला त्या व्यासपीठावरून खाली आल्या त्या वेळी प्रेक्षकातून उठून बेगम अख्तर समोर आल्या आणि त्यांनी सुलोचना कदम यांना जवळ घेतले आणि मायेने विचारपूस केली. त्यांनी विचारले ,” इतके सुंदर उर्दू तुम्ही कोणाकडे शिकलात?” त्यावर सुलोचना बाईंनी सांगितले मी कुणाकडून शिकले नाही पण ऐकून ऐकून आणि शब्दांचा अभ्यास करून मी उर्दू , हिंदी शिकले. यावर बेगम अख्तर आश्चर्य व्यक्त केले होते. (Entertainment)
१९५२ साली आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या मराठी चित्रपटात (ज्याला संगीत वसंत देसाई यांची होते) त्यांनी दोन लावण्या गायल्या त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. शामराव चव्हाण त्यावेळी ‘कलगी तुरा’ हा चित्रपट बनवत होते. संगीत दत्ता कोरगावकर यांचे होते. त्यात सुलोचना कदम गायल्या.नंतर सुलोचना कदम यांनी शामराव चव्हाण यांच्याशी लग्न केले आणि सुलोचना कदमच्या सुलोचना चव्हाण झाल्या. (Sulochana chavan untold stories)