
Dilip Kumar : दिलीपकुमार, अमिताभ आणि शाहरुख हे तीन दिग्गज कोणत्या सिनेमात एकत्र येणार होते ?
भारतीय प्रेक्षकांना मल्टीस्टारर सिनेमाचे खूप आकर्षण आहे. हा ट्रेंड सत्तर आणि ऐंशीच्या दशकात खूप वाढला होता, अर्थात त्यापूर्वी देखील मल्टीस्टारर सिनेमे येतच होते पण प्रमाण कमी असायचे. बी आर चोप्रा यांनी १९६५ साली ‘वक्त’ हा तीन अभिनेत्यांना (राजकुमार, सुनील दत्त आणि शशी कपूर) एकत्र घेऊन मल्टीस्टार सिनेमा काढला होता. यानंतर सत्त्तर आणि ऐंशीच्या दशकात त्याचे पेवच फुटले. राजकुमार कोहली यांच्या ‘नागीन’ (१९७५) या सिनेमात फिरोज खान , जितेंद्र, सुनील दत्त, कबीर बेदी, विनोद मेहरा,रेखा, रीना रॉय, मुमताज, योगिता बाली, प्रेमनाथ अशी जबरा स्टार कास्ट होती. या चित्रपटानंतर दोन किंवा तीन अभिनेते एकत्र येऊन सिनेमा काढण्याचा ट्रेंड सुरू झाला. हे प्रमाण वाढतच गेले.
‘शोले’, ‘त्रिशूल’ ,’जानी दुश्मन’ ,’बदले की आग’, ‘कातिलों के कातिल’, ‘राजतिलक’, ‘कयामत’, ‘सोने पे सुहागा’ हे आणि असे सिनेमे येतच गेले. अर्थात सर्वच मल्टीस्टारर सिनेमाला यश मिळाले नाही. ऐंशी च्या दशकात अंडर वर्ल्डचा काळा पैसा या धंद्यात येऊ लागल्याने सिनेमाचे बजेट वाढत होते आणि त्यातून देखील मल्टीस्टारर सिनेमाचे प्रमाण वाढत होते. लोकप्रियकलावंत घेऊन सिनेमे काढण्याचा प्रकार वाढत होता. सुभाष घई यांनी विधाता, कर्मा, सौदागर हे सिनेमे दिलीप कुमार ला घेवून बनवले आणि हिट करून दाखवले.

नव्वदच्या दशकात थोडा ट्रेंड बदलला. सोलो हिरोंचे चित्रपट येवू लागले. शाहरुख खान, सलमान, आमीर, गोविंदा , अजय देवगण , अक्षय कुमार हे सर्व जण एकट्याच्या जीवावर सिनेमे हिट करून दाखवू लागले. अर्थात या काळात दोन अभिनेते घेवून सिनेमे बनतच होते. पण सुभाष घई यांनी २००२ साली दिलीप कुमार , अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या तीन सुपरस्टारला घेऊन एका चित्रपटाची घोषणा केली. या घोषणेने बॉलीवूड मध्ये प्रचंड हवा निर्माण केली. हे तीन बडे कलावंत पहिल्यांदाच एकत्र येणार होते. सिनेमाचे नाव होते ‘ मदर लँड ‘. ही एक वॉर मूवी होती. या चित्रपटाबाबत सुभाष घई खूप सिरीयस होते. त्यांनी या सिनेमासाठी तीन गाणी देखील रेकॉर्ड करून ठेवले होते.

यापूर्वी अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार रमेश सिप्पी यांच्या ‘शक्ती’ (१९८२) या चित्रपटात एकत्र आले होते. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान मोहब्बते , कभी खुशी कभी गम या चित्रपटात एकत्र आले होते. खरं तर २००२ साली दिलीप कुमार यांनी चित्रपटात काम करणं बंद केलं होतं. पण सुभाष घई यांच्या आग्रहासाठी ते तयार झाले. चित्रपटाच्या घोषणेनंतर बॉलीवूडमध्ये एक जबरदस्त हवा निर्माण झाली कारण तीन तीन सुपरस्टार पहिल्यांदाच एकत्र येत होते.
==============
हे देखील वाचा : Mukesh : जेंव्हा मुकेश यांनी शैलेंद्रसिंग गाताना हार्मोनियमची साथ दिली!
==============
पण शाहरुख खान यांनी विचार केला सिनेमाचा सर्व फोकस हा दिलीपकमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावरच राहील आणि आपल्यावर फार काही फोकस राहणार नाही शाहरुख खान त्यावेळी सोलो हिरो मूव्हीज करत होता त्याला सिनेमाचे यश कोणा सोबतही शेअर करायचे नव्हते. त्या मुळे त्याने पहिल्यांदा या सिनेमात काम करण्याबाबत असमर्थता दर्शवली. शाहरुख खान याने सिनेमातून वॉक आउट केल्यानंतर सुभाष घई यांचा या सिनेमातील इंटरेस्ट संपला आणि हा सिनेमा निर्माण व्हायच्या आधीच बंद पडला.
==============
हे देखील वाचा : Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?
==============
आज इतक्यानंतर इतके वर्षानंतर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जर हा सिनेमा आला असता तर खरोखरच जबरदस्त मूवी झाला असता कारण त्या काळात सुभाष घई या नावाला एक वलय होतं आणि त्यांचे सर्व सिनेमे सुपरहिट होत होते. परंतु शाहरुख खान याने असमर्थता दर्शवल्याने हा मोठा प्रोजेक्ट बंद पडला!