
Manmohan Desai : मनजी यांचे हे चित्रपट पडद्यावर यायला हवे होते…..
चित्रपटाच्या जगात ‘निर्मितीच्या कोणत्याही टप्प्यावर (अर्थात स्टेजवर) चित्रपट कायमचा बंद पडणे’ हे होतच असते. जणू खेळाचाच एक भाग. अशा पडद्यावर येऊ न शकलेल्या चित्रपटांची नोंदणी करण्याची पद्धत असती तर त्यांची संस्था पडद्यावर आलेल्या चित्रपटांपेक्षा जास्त भरली असती. प्रत्येक दिग्दर्शक आणि अशाच प्रत्येक कलाकाराच्या प्रगती पुस्तकात अशा बनू न शकलेल्या चित्रपटाच्या गोष्टी आहेत. त्या दुर्लक्षित राहू नयेत असे वाटते. असेच एक यशस्वी दिग्दर्शक मनमोहन देसाई.

१९७७ या एकाच वर्षात त्यांचे ‘चाचा भतीजा’, ‘धरमवीर’, ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘परवरीश’ असे चार मसालेदार मनोरंजक चित्रपट फर्स्ट शोपासूनच सुपर डुपर हिट. त्या काळात पहिल्या दिवसाचा पहिल्या खेळ संपल्यावर बाहेर पडत असलेल्या पब्लिककडून ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत त्यावरुन पिक्चर हिट की फ्लॉप याचा परफेक्ट निष्कर्ष काढला जाई. आजच्या व्यावहारिक युगात ‘आज किती कमाई झाली’ याची दररोज आकडेमोड करूनही चित्रपट यशस्वी ठरलाय की नाही हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. तात्पर्य, पब्लिक क्या बोलती है हेच चित्रपटाचे यशापयश सांगत असते.
मनमोहन देसाई यांच्या पिक्चरचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला होता. ते आणि अमिताभ बच्चन जोडी जमलेली. अपवाद ‘गंगा जमुना सरस्वती’ (१९८८)च्या फ्लॉपचा. मला आठवतंय मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकाना हा चित्रपट मेट्रो चित्रपटगृहात फस्ट डे फर्स्ट शोला दाखवला असता मध्यंतरात आम्हाला भेटायला आलेल्या मनजी आणि त्यांचा मुलगा केतन देसाई यांचा आत्मविश्वास हरवलेला चेहरा पाहूनच लक्षात आले त्यांना लक्षात आले होते की पब्लिकला आपला हा चित्रपट आवडलेला नाही….

अशा मनमोहन देसाई यांचे भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान नक्कीच आहे. भलेही त्यांच्या चित्रपटात ‘सेन्स’ नसतो, अतिशयोक्ती असते, येडच्यापपणा असतो असे त्या काळातील काही समिक्षक लिहित होते. महत्वाचं आहे ते समाजातील खालच्या माणसापर्यंत त्यांचा चित्रपट पोहचला. त्यांनी तो मनसोक्त मनमुराद एन्जॉय केला. अशा मनमोहन देसाई यांचे काही चित्रपट मात्र पडद्यावर येऊ शकले नाहीत. ते अधेमधे कुठे तरी कायमचे बंद पडले. ते चित्रपट पडद्यावर आले असते तर कदाचित चित्रपटाच्या इतिहासात काही चांगली भर पडली असती.
त्यातला एक चित्रपट आहे, ‘बाजीराव मस्तानी’. या चित्रपटात राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हे दोघेही या व्यक्तीरेखेत नक्कीच शोभले असते. सत्तर एम एमचा पडदा छान सजला, रंगला असता. मनजी यांच्या ‘सरफरोश’ मध्ये अमिताभ बच्चन अगदी वेगळ्या गेटअपमध्ये होता. परवीन बाबी त्यात नायिका होती आणि सुभाष देसाई निर्मित या चित्रपटाची सात रिळेही तयार झाली होती. परवीन बाबीच्या बिघडलेल्या मानसिक अवस्थेने चित्रीकरणासाठीच्या तिच्या तारखा मिळणं अवघड होत होत गेले आणि हा चित्रपट रखडला तो कायमचाच.

याशिवाय त्यांच्या ‘गजब’, ‘खुदा गवाह’, ‘रोजी रोटी’ अशा चित्रपटांचा समावेश होतो. (कालांतराने पडद्यावर आलेल्या सी. पी. दीक्षित दिग्दर्शित ‘गजब’, मुकुल आनंद दिग्दर्शित ‘खुदा गवाह’ या चित्रपटाच्या केवळ नावाशी संबंध आहे. आणि असे होत असते….) आता चित्रपट असे मध्येच बंद का पडतात? कधी अपेक्षित कलाकार अन्य चित्रपटात फार बिझी असतात तर कधी अपेक्षित फायनान्सर मिळत नाही. आणि मग हे चित्रपट मागे मागे पडत जातात. ‘रोजी रोटी’ या चित्रपटाच्या घोषणा आणि मुहूर्तामागे वेगळीच गोष्ट आहे. एस. रामनाथन निर्मित आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटाचा अंधेरीतील नटराज स्टुडिओत अतिशय उत्साहाने मुहूर्त झाला.
================================
हे देखील वाचा : Amitabh Bachchan : ‘कभी कभी’ चित्रपटाची ५० वर्ष पूर्ण!
================================
अमिताभ बच्चन, ऋषि कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांनी त्यात सहभाग घेतला. या रंगतदार मुहूर्ताच्या गोष्टी आम्ही सिनेपत्रकार लिहितोय तोच दोन गोष्टी घडल्यादेखिल. एक म्हणजे ऋषि कपूरने चित्रपट सोडला आणि दुसरं म्हणजे मनजी यांनी मिथुन चक्रवर्तीला सोलो हिरो अशी संधी देत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘रोजी रोटी’ या चित्रपटाचा मुहूर्त केला. का माहित आहे? मिथुन चक्रवर्तीच्या ‘गंगा जमुना सरस्वती’ चित्रपटासाठी तारखा हव्या असतील तर त्याला एक विश्वास दाखवला पाहिजे की, हा चित्रपट पूर्ण होताच तुझ्यासोबत एक देमार घेमार ढिश्यूम ढिश्यूम मारधाड ऍक्शन चित्रपट आपण बनवणार आहोत….
================================
हे देखील वाचा : Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….
================================
‘गंगा जमुना सरस्वती’ रसिकांनी नाकारताच ‘रोजी रोटी’ आपोआपच बंद पडला. म्हटलं ना, पडद्यावर न आलेल्या चित्रपटाच्या गोष्टी जास्त रंजक आहेत त्यामुळे त्या सांगायला हव्यातच. इतकेच नव्हे तर मनमोहन देसाई यांनी एन. चंद्रा दिग्दर्शित ‘ गुंडागर्दी’ या नावाच्या चित्रपटाचीही केलेली घोषणा फक्त आणि फक्त बातमीपुरतीच राहिली. होते असे अधूनमधून.