Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Mythological Cinema : जून ते ऑगस्ट पौराणिक चित्रपटांच्या भक्तीचा महिमा
चित्रपटसृष्टीत काही अलिखित नियम आहेत याची तुम्हालाही कल्पना आहेच. दिवाळीत शाहरुख खानचा पिक्चर हे ‘बाजीगर’ (१९९३)पासून रुजलयं. ईदला सलमान खानचा चित्रपट हेही हिट. अर्थात एकादा चित्रपट रसिक नाकारतात. तसेच सत्तरच्या दशकात जून महिना सुरु होताच पौराणिक चित्रपट प्रदर्शित होऊ लागत. आणि मग श्रावण भाद्रपद महिन्यात (जुलै ऑगस्ट) हे पौराणिक चित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रमाण वाढत वाढत जाई. चित्रपट व्यवसायाची हीदेखील एक खासियत. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील हाही एक फंडा. (Mythological movie history)
पौराणिक चि’त्रपटांची आपल्याकडची परंपरा मूकपटांपासूनची. याचं कारण, तेव्हा ‘चित्रपटासाठीची गोष्ट ‘ याचा जन्म झाला नव्हता. जनसामान्यांना देव देवतांच्या गोष्टीत विशेष आनंद होत होता. दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ ( ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित) हा आपल्याकडील पहिला मूकपट पौराणिक आहे. आणि त्या काळाशी ते अतिशय सुसंगत आहे. त्या काळात मोहिनी ‘भस्मासुर’, ‘लंका दहन’, ‘कृष्ण जन्म’, ‘सैरंध्री’, ‘श्री कृष्ण सुदामा’, ‘शनी प्रभाव’ असे अनेक पौराणिक मूकपट निर्माण होत जाताना समाजाला या दृश्य माध्यमाची हळूहळू ओळख होत गेली. अशी पौराणिक गोष्ट चालत्या फिरत्या दृश्य स्वरुपात पाहणे म्हणजेच चित्रपट ही समज होत गेली. चित्रपट इतिहासाची पाळेमुळे अशी खोलवर रुजलीत. ती आपल्याकडील समाज व्यवस्थेनुसार आहेत. (Latest entertainment news)

चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ ( १९३२) हा आपल्याकडील पहिला मराठी बोलपट पौराणिक आहे. हेही त्या काळानुसार. प्रेक्षकांना समजायला सोपी गोष्ट म्हणजेच देव देवतांच्या गोष्टी अशीच सरळ सोपी व्याख्या होती. ‘बोलू लागलेला चित्रपट’ समाजात रुजताना पौराणिक चित्रपट एक महत्वाचा घटक होता. ‘माया मच्छिंद्र’,’ रुक्मिणी हरण’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘आकाशवाणी’, ‘कृष्णार्जुन युध्द’, ‘चंद्रसेना’, ‘कालियामर्दन’, ‘गंगावरण’, ‘गोपालकृष्ण’, ‘अकरावा अवतार’, ‘माया बाजार’, ‘गोरखनाथ’, ‘संत ज्ञानेश्वर’ अशा अनेक मराठी पौराणिक चित्रपटांची निर्मिती होत होत मराठी चित्रपटाचा प्रवास पुढे जात राहिला. याबरोबरच संतपट, ऐतिहासिक चित्रपट मग ग्रामीण चित्रपट वगैंरेचे प्रवाह त्यात मिळत/मिसळत गेले.(Entertainment tadaka)
================================
=================================
हिंदीतही पौराणिक चित्रपटांची खूपच मोठी यशस्वी वाटचाल आहे. १९३२ साली ‘ भक्त प्रल्हाद’ हा पौराणिक चित्रपट पडद्यावर आला. आणि पौराणिक चित्रपटांची दीर्घकालीन परंपरा सुरु झाली. तीदेखील स्वाभाविकच म्हणायला हवी. याचं कारण त्या काळातील जनसामान्यांना चित्रपटाकडून पौराणिक गोष्टीच्या मनोरंजनाची जास्त अपेक्षा असे. अशा चित्रपटांची पटकथा, त्याचे सेट्स, त्याचे छायाचित्रण, त्याचे संकलन यात फार दर्जा असावा अशीही अपेक्षा नसे. पडद्यावर गोष्ट दिसली तरी त्याचा आनंद होई. आणि साधारण जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत हे मराठी व हिंदी पौराणिक चित्रपट प्रदर्शित होत. गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्ये ‘हर हर महादेव’, ‘श्रीकृष्ण लीला’ अशा पौराणिक चित्रपटाच्या वेळी त्यातील अनेक दृश्यांचे उभे केलेले अतिशय ऐसपैस देखावे पाहायलाही गर्दी होई. एखाद्या श्रीकृष्णच्या मूर्तीची पूजाही होई. अनेक शहरांत, ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये पौराणिक चित्रपटाच्या एकाद्या पोस्टरला हार, अगरबत्ती, नारळ फोडून पूजा, त्या देव देविकांचे फोटो विक्रीला असणे हे नित्याचेच. त्या काळात चित्रपट म्हणजे समाजाचा भावनिक आधार होता.(Bollywood movies)

होमी वाडिया यांनी ‘श्रीराम भक्त हनुमान’ (१९४८), ‘श्रीगणेश महिमा’ (५०), ‘हनुमान पाताल विजय’ (५१), ‘श्रीकृष्ण लीला’ (७२) या पौराणिक चित्रपटांची तर चंद्रकांत यांनी ‘हरी दर्शन’ (७२), ‘बजरंगबली’ (७६), ‘कृष्णा कृष्णा’ (८६). यासह अनेक पौराणिक चित्रपट येत राहिले. ‘गोकुल का चोर’, ‘बद्रीनाथ धाम’, ‘भगवत गीता’,’बाल गणेश’, ‘हनुमान’, ‘शकुंतला’, ‘भगवान परशुराम’, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘वाल्मिकी’, ‘लव कुश’, ‘वाल्मिकी’, ‘संपूर्ण रामायण’,’शिव महिमा’, ‘अलख निरंजन’, ‘श्रीसत्यनारायण की महापूजा’, ‘शिवमहिमा’, ‘शिर्डी के साईबाबा’ वगैरे वगैरे. या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग भाबडा आणि भक्तीत रमणारा. (Entertainment news update)
================================
हे देखील वाचा: Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!
=================================
सतराम रोहरा निर्मित व विजय शर्मा दिग्दर्शित ‘जय संतोषी मा’ ( मुंबईत रिलीज ३० मे १९७५) ने जणू लोकप्रियतेत प्रचंड क्रांती केली. मुंबईत ‘अलंकार’ (मॅटीनी शो), ‘एडवर्ड’ (धोबीतलाव), ‘किस्मत’ (प्रभादेवी) इत्यादी थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होताना जणू फार मोठे सामाजिक सांस्कृतिक वातावरण ढवळून काढणारे काही घडेल याची अजिबात कल्पनाच नव्हती. हिंदी चित्रपटातच एक हुकमी संवाद असतो ना, होनी को कौन टाल सकता है तसंच झालं. टेक्निकली सर्वसाधारण असलेला पण गीत संगीतात सोप्या चालीने खुललेला हा चित्रपट माऊथ पब्लिसिटीवर जोरात चालू लागला.(Entertainment update)