
Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार
चरित्रपट हा कायमच उत्सुकता वाढवतो. संजय दत्तच्या वादळी आयुष्यावरील राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ असो (रणबीर कपूरने ती व्यक्तिरेखा एकदम कडक साकारली) वा भारतीय क्रिकेटमधील चपळ क्षेत्ररक्षक धोनी याच्या जडणघडणीवरील नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ असो हे चरित्रपट यात विशेषच. कारण, संजय दत्त, महेन्द्रसिंग धोनी यांची कारकीर्द आजही आपल्या समोर घडतेय.. (Biopics of Indian cinema)

सिल्क सिम्था (हा दक्षिणेकडील उच्चार) हिच्या बेधडक आयुष्यावरील मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘डर्टी पिक्चर’ काहीसा भडक वाटला पण त्यात दाहक वास्तव होते. गुरुदत्तचे आयुष्य प्रचंड संवेदनशील. त्याच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट निर्माण होत आहे. भावना तलवार व शीतल तलवार दिग्दर्शित या चरित्रपटाचे नाव ‘प्यासा’ असे आहे. गुरुदत्तच्या आयुष्याची जणू ओळख यात होते आणि त्याच्या कारकीर्दीतील त्याच्याच दिग्दर्शनातील हा सर्वोत्तम चित्रपट. गुरुदत्तची व्यक्तिरेखा विकी कौशल साकारणार आहे. गुरुदत्त साकारण्यास विकी कौशल खरंच योग्य आहे अथवा नाही हा कदाचित वादाचा विषय होऊ शकतो. गुरुदत्त एकच असू शकतो. दुसरा गुरुदत्त होणे अजिबात शक्य नाही हे कितीही सत्य असले तरी ती व्यक्तीरेखा साकारण्याचे आव्हान कोणी स्वीकारणे आवश्यक. ते जड ठरले की आणखी काही हे हा चरित्रपट पडद्यावर आल्यावरच समजेल. अनुराग कश्यप यानेही गुरुदत्तच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट निर्माण करण्याची घोषणा केली होती. (Entertainment news)

गुरुदत्त चरित्रपटाला ‘प्यासा’ नाव अतिशय समर्पक. गुरुदत्त चरित्रपट निमित्ताने ‘प्यासा’ चित्रपटाची दखल हवीच. गुरुदत्त फिल्म या बॅनरखालील अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक गुरुदत्तचा ‘प्यासा’ (रिलीज २२ फेब्रुवारी १९५७) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक माईलस्टोन. त्याच्या प्रदर्शनास यशस्वी ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे खरे वाटू नये. आपला आशय, अभिनय, गीत संगीत आणि दिग्दर्शनीय सादरीकरण यामुळे हा चित्रपट आजही आपल्या मनाची पकड घेतो, अंतर्मुख करतो आणि एका वेगळ्या अनुभूतीचा प्रत्यय देतो. रसिकतेचा प्रत्यय देतो. या चित्रपटाचे हे देणे खूप महत्वाचे आहे. (Bollywood tadaka)

‘प्यासा’ म्हटल्यावर गुरुदत्त, वहिदा रहेमान यांचा दर्जेदार अभिनय डोळ्यासमोर येतोच. गुरुदत्तच्या दिग्दर्शनातील प्रगल्भतेचा रुपेरी आविष्कार म्हणून ‘प्यासा’ कायमच ओळखला जातो. हा रोमॅन्टीक मेलोड्रामा आहे. कोलकत्ता (तेव्हाचे कलकत्ता) शहरात ही गोष्ट घडते. ‘प्यासा’ म्हणजे तहानलेला. प्रेम करण्यासाठी आसूसलेला असा ‘प्यासा’. पण हे जग निष्ठूर आहे (अगदी पासष्ट वर्षांपूर्वीही….) असंवेदशील आहे. या जगात पैसा म्हणजे सर्व काही आहे. सर्वश्रेष्ठ आहे. (Claasic movies)
================================
हे देखील वाचा:Mythological Cinema : जून ते ऑगस्ट पौराणिक चित्रपटांच्या भक्तीचा महिमा
=================================
ही कथा विजय (गुरुदत्त) नावाच्या कवीची आहे. घर असूनही बेघर झालेला, नातीगोती हरवलेला उमदा कवी. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीपुढे तो निराश होतो, हतबल होतो. त्याची व्यथा समाजाला ठाऊक नाही. यात त्याला एकच व्यक्ती सावरते. ती म्हणजे गुलाबो (वहिदा रहेमान). तीही समाजाच्या अत्याचाराची बळी आहे. त्यामुळे विजय आणि गुलाबो यांचे भावबंध जुळतात. ते भावनिकदृष्ट्या जवळ येतात. एका रात्री पोलीस गुलाबोच्या मागे लागतात. ती त्यांच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा विजय तिला वाचवतो आणि अतिशय शांतपणे पोलिसांना सांगतो, ही माझी पत्नी आहे. चित्रपटात आणखी काही गोष्टी घडतात, नाट्य घडते. पटकथा लेखक अबरार अल्वी यांना पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला जुहू चौपाटीवर गुलाबो भेटली. तेव्हाच्या अनेकदा झालेल्या भेटीतून समजले की एका कविला समजते की रद्दीच्या दुकानातून आपल्या कवितेच्या वह्या एका युवतीने विकत घेतल्या आहेत आणि अशा गोष्टीतून कथाबीज आकार घेत गेले.

या चित्रपटात माला सिन्हा (मीना), रहेमान (घोष), मेहमूद (विजयचा भाऊ), जॉनी वॉकर (अब्दुल सत्त्तार) तसेच कुमकुम, लीला मिश्रा, टूणटूण, मोनी चटर्जी इत्यादींच्याही भूमिका आहेत. तसाच विशेष उल्लेख करायला हवा तो छायाचित्रणकार व्ही. के. मूर्ती (ब्लॅक अॅण्ड व्हाईट अर्थात कृष्ण धवल स्वरुपातही त्यांनी उत्तम रंग भरला आहे. चित्रपटातील काही फ्रेम्स तर कायमच लक्षात राहतात.) तसेच संकलक वाय. जी. चव्हाण यांचा उल्लेख हवाच. त्यांनी या चित्रपटाला एक लय दिली आहे आणि ती आपल्याला पहिल्याच दृश्यापासून गुंतवत नेते. आणि हे सगळे होत असताना या पटकथेत दर्जेदार गीत संगीताची पेरणी आहे. एकेक गाणे म्हणजे एक वेगळा आनंद आहे. सर जो तेरा टकराये ( हे गाणे जॉनी वॉकरवर आहे.), तर अन्य गाणी, ‘हम आपकी आंखो में’,’ जाने क्या तू ने कही’, ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला’, ‘आज साजन मोहे अंग लगा’, ‘जहां नाझ है हिंद पर’, ‘ये दुनिया अगर मिल जाए, तंग आ चुके है…’

गीते साहिर यांची असून संगीत सचिन देव बर्मन यांचे आहे. साहिर यांच्या चित्रपट गीतामधील काव्य ‘हा एक वेगळा विषय आहे. तसेच त्या काव्यात प्रेम, ओढ, उत्कटता, विरह, उदासी हा साहिरची वेगळी ओळख करुन देतो. ‘प्यासा’ तील गाण्यात तसा प्रत्यय येतो. हा चित्रपट साहिरच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू आहे. त्याच्या प्रतिभा आणि चित्रपट गीतासाठीचे कौशल्य यांचा त्यात प्रत्यय येतो आणि सचिन देव बर्मन यांनी त्यांची त्याच उत्तम रितीने बांधणी केली. ही गाणी मोहम्मद रफी, गीता दत्त आणि हेमंतकुमार यांनी गायली आहेत. ही गाणी या चित्रपटाची थीम आणि व्यक्तीमत्व अधिकाधिक गडद करतात. प्रभावी करतात. चित्रपटाचा नायक कवी असल्याने यात गाण्यांना विशेष स्थान आहे. पण ते अधिकाधिक कल्पकतेने पडद्यावर येते. एकूणच चित्रपटात लोकप्रिय (व्यावसायिकदृष्ट्या) आणि कलात्मक (बौद्धिक मनोरंजन) या दोन्ही घटकांचे उत्तम मिश्रण आहे. गुरुदत्त विचारवंत दिग्दर्शक. आणि त्यातही पटकथेची उत्तम जाण, संवादाचा प्रभावी वापर आणि दृश्य माध्यमाची ओळख असल्याने त्याचे चित्रपट एकाच वेळेस कलात्मकता आणि मनोरंजन यांची उत्तम सांगड घालणारे ठरले. जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, गुरुदत्तांमध्ये मला विशेष भावते ती त्यांच्या कॅमेरास असणारी लयीची आणि प्रवाहीपणाची जाण…

असो. त्या काळात ग्रामोफोन (तो घरात असणे प्रतिष्ठेचे मानले जाई), रेडिओ (संपूर्ण चाळीत एकाद्या घरात, ग्रामीण भागात तर दूरवर एकाद्या घरात), इराणी हॉटेलमधील जुक्स बॉक्स, वाद्यवृंद या मोजक्याच माध्यमातून आपणापर्यंत गाणी पोहचत आणि मग हीच आवडलेली गाणी ऐकण्या आणि पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा ‘प्यासा’ (त्या काळातील असे अनेक चित्रपट) पहा हाच पर्याय उपलब्ध असे. फस्ट रनला दोन तीनदा पाहिलेला ‘प्यासा’ त्यानंतर रिपीट रन आणि मॅटीनी शोला पुन्हा पुन्हा पाहताना सत्तरच्या दशकात रसिकांची आणखीन एक पिढी आली आणि त्यांनाही ‘प्यासा’ ने विलक्षण भुरळ घातली.
सत्तरच्या दशकातच फिल्म सोसायटी चळवळ आकार घेऊ लागली त्यात गुरुदत्त दिग्दर्शित ‘प्यासा’ (१९५७), ‘कागज के फूल’ (१९५९. विशेष म्हणजे हा आपल्या देशातील पहिला सिनेमास्कोप चित्रपट) आणि ‘साहिब बीवी और गुलाम’ (१९६२. गुरुदत्त फिल्मच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अबरार अल्वी यांचे आहे) या चित्रपटांचे मिनी थिएटरमध्ये सातत्याने आवर्जून शो आयोजित केले गेल्याने ते पुढील पिढीतील चित्रपट अभ्यासकाना उपयुक्त ठरले. मुंबईत १९८४ साली भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (अर्थात इफी) सिंहावलोकन विभागात गुरुदत्तच्या चित्रपटाचा समावेश होता. यात या तीन चित्रपटांसह गुरुदत्त फिल्मचा पहिला चित्रपट ‘आरपार’ (१९५४), ‘मिस्टर अॅण्ड मिसेस ५५’ (१९५५) या चित्रपटांचा समावेश होता आणि मी तेव्हा मिडियात अगदी नवीन होतो. पण आवर्जून हे चित्रपट पाहिले. चित्रपटाच्या इतिहासात डोकावताना चित्रपट हे माध्यम व व्यवसाय यांच्या जडणघडणीतील अनेक गोष्टी माहीत होत जाताना याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. (Bollywood news update)

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला यु ट्यूबवर गुरुदत्तचे ‘प्यासा’ आणि इतर चित्रपट पाहायला मिळताहेत (अथवा आवर्जून पहावेत), गुरुदत्त समजत जाईल. चित्रपटाच्या इतिहासात डोकावण्याची, पूर्वी काय काय घडले हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच असेल, त्यात गुरुदत्तचे चित्रपट एक वेगळी अनुभूती ठरेल. अर्थात, अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातील गुरुदत्त (महेश कौल दिग्दर्शित सौतेला भाई वगैरे) अन्य निर्मिती संस्थांसाठीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन (नवकेतन फिल्मसाठी ‘बाजी’ इत्यादी), वहिदा रहेमानशी विशेष नातेसंबंध असलेला गुरुदत्त, पाश्वगायिका गीता रॉयशी विवाह, त्याचे निर्मितीवस्थेत बंद पडलेले चित्रपट (राझ वगैरे वगैरे) अशा अनेक गोष्टी आहेतच.
================================
हे देखील वाचा: Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!
=================================
माध्यमे बदलत राहिली आणि गुरुदत्त पर्व, आणि अनेक गोष्टी समोर येत राहिल्या. २००० साली बीबीसीसाठी नसरीन मुन्नी कबिरने गुरुदत्तवर एक माहितीपट निर्माण केला आहे, त्यातून गुरुदत्तची काही प्रमाणात ओळख होते. आता गुरुदत्त चरित्रपट एक मोठीच झेप ठरावा. मल्टीप्लेक्स ओटीटी युगात आज जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट/ मालिका/ वेबसिरिज पाहता येताहेत. उत्तम कन्टेन पाह्यला मिळतोय. चरित्रपटामुळे गुरुदत्तचं अभिनेता, व्यक्ती व दिग्दर्शक म्हणून असलेली ओळख जगभरातील अनेक देशांत पोहचेल. भारतीय संघ एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्व म्हणून गुरुदत्तची प्रतिमा ( इमेज) आहे. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या युगातील या संवेदनशील कलाकाराच्या आयुष्याचा क्लायमॅक्स धक्कादायक ठरला. गुरुदत्तचा मृत्यू (१० ऑक्टोबर १९६४) नैसर्गिक की ती आत्महत्या होती हा कायमच एक प्रश्न राहिला. गुरुदत्त चरित्रपटात त्याचे उत्तर मिळेल का? गुरुदत्त साकारण्यापूर्वी विकी कौशल पडद्यावरचा गुरुदत्त, सेटवरचा गुरुदत्त, त्याच्या खाजगी व व्यावसायिक आयुष्याची सरमिसळ आणि गुरुदत्तवरचे साहित्य (पुस्तके) यांचे सखोल वाचन व अभ्यास करेल ( खरं तर करावाच) हीच अपेक्षा. गुरुदत्तबद्दलची प्रतिमा कायमच मनात जपलेली राहणे आवश्यक आहे. गुरुदत्त एकच होता. गुरुदत्त एकच असतो याचे भान चरित्रपट निर्मितीत असावे….(Biopics of Bollywood)