Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं

विक्रम भट्टच्या Kasoor चित्रपटाची पंचवीशी….
१९९३ साली दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ते २०२६ मध्ये दिग्दर्शनातील तब्बल छत्तीसावा चित्रपट या वेगाचे कौतुक करायचं की नवल वाटतं? तेहतीस वर्षांत हे प्रगती पुस्तक आहे. सरळ हिशोब आहे, एका वर्षात एक चित्रपट. खरं तर त्यात तीन चित्रपट जास्तच. ही किमया आहे, दिग्दर्शक विक्रम भट्टची. सध्या तो आर्थिक व्यवहार प्रकरणात गजाआड आहे याची आपणास कल्पना आहेच. इतके चित्रपट दिग्दर्शित करुनही त्याची भूक पूर्ण झाली नाही ही या चित्रपट माध्यम आणि व्यवसायचे दुर्दैव.
कोणी किती वेगात काम करायचे हा अतिशय व्यक्तिगत प्रश्न आहे. पूर्वीचे अनेक दिग्दर्शक आपला एक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळ आपल्या खाजगी आयुष्यात रमत. पडद्यावर आणलेला चित्रपट मनातून बाहेर काढत. आपल्या आवडीनिवडी जपत आणि मग आपल्या पुढील चित्रपटाच्या तयारीला लागत. सर्वप्रथम एक थीम अथवा प्लॉट, त्यावर पटकथा, त्यावर काम करत असतानाच कलाकार, तंत्रज्ञ यांची निवड. त्यात संवाद लेखन. हळूहळू एक टीम तयार होत जाते. गीत संगीताचे ध्वनिमुद्रण होते.

चित्रीकरण स्थळे शोधणं सुरु होते. अनेक घटक एकत्र आल्यावर चित्रपट निर्मिती प्रक्रिया आकार घेत जाते. विक्रम भट्टने कदाचित यातील बरीच कामे इतरांकडे सोपवली असतील आणि जास्त लक्ष चित्रीकरणावर ठेवले असावे. आणि ही गोष्ट तो दिग्दर्शक महेश भट्टकडून शिकला असावा. त्यांच्याकडेच तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. महेश भट्टमध्ये एकाच वेळेस तीन चित्रपट दिग्दर्शित करण्याची क्षमता होती.
मला आठवतंय एकदा वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओत आम्हा चित्रपट पत्रकारांना निर्माते यश जोहर यांनी ‘ड्युप्लीकेट’ या चित्रपटाच्या सेटवर शूटींग रिपोर्टीगसाठी आमंत्रित केले होते. सेटवर शाहरुख खान, जुही चावला आणि सोनाली बेंद्रे होते. फराह खान नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करत होती. अगदी सुखद योग आला होता. सेटवर गेल्यावर समजले की, महेश भट्ट शेजारच्याच सेटवर ‘अंगारे’च्या सेटवर अक्षयकुमार आणि पूजा भट्ट यांच्यावर काही दृश्ये दिग्दर्शित करीत आहेत. त्या काळात मोबाईल असता तर महेश भट्टनी एकाच वेळी किमान चार चित्रपटांचे दिग्दर्शन केले असते. पण तरीही त्यांनी आपला दर्जा टिकवला आणि वेळीच दिग्दर्शनातून थांबले. ते जास्त महत्वाचे.

विक्रम भट्टने ‘जानम’ (१९९३) पासून चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले. आणि मग ‘दिग्दर्शन फॅक्टरी’ सुरु केली. त्याने दिग्दर्शित केलेला ‘कसूर’ हा चित्रपट २ फेब्रुवारी २००१ रोजी प्रदर्शित झाला. म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. हा चित्रपट आठवतोय का? या चित्रपटात आफताब शिवदासानी, लीसा रे (तिला या चित्रपटात दिव्या दत्ताचा आवाज होता आणि दिव्या दत्ताचे डबिंग मोना घोष शेट्टीने केले) यांच्यासह अपूर्व अग्निहोत्री, इरफान खान, आशुतोष राणा, विश्वजीत प्रधान, मुरली शर्मा इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.
================================
हे देखील वाचा : एकावन्न वर्षे झाली, ये Deewar तुटेगी नहीं…
================================
हा चित्रपट Jagged Edge या अमेरिकन चित्रपटाचा अनधिकृत रिमेक आहे. त्या काळात असे अनेक हिंदी चित्रपट एखाद्या विदेशी चित्रपटाची अनधिकृत रिमेक असे. यावर मल्लीनाथी असे की, अमूकतमूक विदेशी चित्रपटावरुन प्रभावीत होवून आपण आपला चित्रपट साकारला आहे. पण अनेकदा अशा विदेशी चित्रपटावरुन पडद्यावर आलेले चित्रपट सही सही असले की ते नाकारले जात. प्रेक्षक सुज्ञ आहेत हो. ते उगाच कोणत्याही चित्रपटाला गर्दी करीत नाहीत.

विक्रम भट्टच्या दिग्दर्शनातील उल्लेखनीय चित्रपट दोनच. एक म्हणजे ‘गुलाम’ (१९९८) आमिर खान आणि रानी मुखर्जी यांच्या भूमिकेत काय बोलती तू या गाण्याने रंग भरला. या चित्रपटात पूजा भट्ट काम करत होती. तिने अचानक नकार दिला आणि रानी मुखर्जीला आती क्या खंडाला एन्जॉय केले. तर दुसरा चित्रपट ‘ऐतबार’ (२००४). या चित्रपटात अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका. हाही चित्रपट विदेशी चित्रपटावरुन बेतलेला वा घेतलेला. गल्ला पेटीवर साधारण यश मिळवलेला. ‘कसूर’ चित्रपटाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा एक फोकस. एकादा दिग्दर्शक असाही असतो. तो न थांबता एकामागोमाग एक चित्रपट दिग्दर्शित करीत असतो. तोही एक ‘विक्रम’च!